व्यापारयुद्धामुळे चीनचे अनेक कारखाने बंद   

वृत्तवेध 

अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा परिणाम आता चीनी कंपन्यांवर झाला आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की चीनची प्रमुख निर्यात केंद्र असलेल्या यिवू आणि डोंगगुआनमधील कारखाने बंद होऊ लागले असून हजारो कर्मचार्‍यांना घरी पाठवण्यात आले आहे.
 
टॅरिफच्या दबावाखाली, खेळणी, क्रीडा साहित्य आणि स्वस्त उत्पादने बनवणार्‍या कंपन्यांनी उत्पादन थांबवले आहे. ‘गोल्डमन सॅक्स’च्या मते अमेरिकेत निर्यात करणार्‍या या क्षेत्रातील एक ते दोन कोटी चीनी कामगारांच्या नोकर्‍या आता गंभीर धोक्यात आहेत. कंपन्या नवीन बाजारपेठांच्या शोधात भटकत आहेत. त्यामुळे जागतिक व्यापार समीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो. चीनमधील कंपन्या आपला मार्ग बदलत आहेत.

भारतात प्रकल्प उघडण्याची तयारी

निंगबो येथील वुड्सवूलसारख्या काही कारखान्यांनी देशांतर्गत बाजारपेठेसाठी ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. बायडू, जेडी. कॉम आणि मैतुआनसारख्या टेक कंपन्या लहान व्यवसायांना ऑनलाइन विक्री आणि स्थानिक वितरणात मदत करत आहेत. तथापि, चीनच्या एकूण निर्यातीच्या (५२४ अब्ज) तुलनेत ही मदत खूप कमी आहे. अनेक चीनी कंपन्या आता अमेरिकेवर अवलंबून राहू इच्छित नाहीत. त्या युरोप, लॅटिन अमेरिका आणि भारतासारख्या बाजारपेठांकडे वळत आहेत. काही कंपन्या भारत आणि आग्नेय आशियामध्ये उत्पादन युनिट उघडण्याचा विचार करत आहेत.

भारतावर काय परिणाम होईल?

२०२४-२५  या आर्थिक वर्षामध्ये भारतातील सक्रिय कंपन्यांची संख्या १.६२ लाखांहून अधिक झाली. पूर्वी चीनमधून वस्तू आयात करणार्‍या अमेरिकन कंपन्या आता भारताकडे पहात आहेत. भारताच्या निर्यातीला मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, शूज आणि फर्निचर यासारख्या क्षेत्रात प्रचंड फायदा होऊ शकतो.
 
देशांतर्गत व्यवसायाला दिलासा: चीनमधून कमी स्वस्त वस्तू येत असल्याने भारतातील देशांतर्गत लघु व्यावसायिकांना दिलासा मिळेल, कारण स्पर्धा कमी असेल.
 
किमतींमध्ये चढ-उतार: चीनमधून येणार्‍या आवश्यक कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे भारतात खर्च वाढू शकतो, जसे की मशीनचे भाग किंवा मोबाईलचे सुटे घटक.
 
थेट परकीय गुंतवणूक वाढवण्याची संधी: चीनमधून बाहेर पडणार्‍या कंपन्या भारतात कारखाने उघडू शकतात. त्यामुळे गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.
 
जागतिक मंदीचा धोका: व्यापारयुद्ध आणखी वाढल्यास जागतिक मंदीची शक्यता कायम राहील. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर दबाव येऊ शकतो.
 

Related Articles